Rohit Sharma : रोहित शर्मा आम्हाला द्या! मुंबई इंडीयन्सकडे ‘या’ फ्रॅंचायजीने साधला संपर्क; कर्णधार करण्याचा प्लान, पण..

Rohit Sharma : रोहित शर्माला मुंबई इंडियन्सननं कर्णधारपदावरुन हटवत संघाचं नेतृत्त्व गुजरात टायटन्समधून आलेल्या हार्दिक पंड्याकडे सोपवलं. शुक्रवारी रात्री मुंबई इंडियन्सनं याबद्दलची माहिती दिली. त्याला आता २४ तास उलटले आहेत.

पण सोशल मीडियावर हा विषय अद्याप चर्चेत आहे. मुंबई इंडियन्सच्या आणि विशेषत: रोहित शर्माच्या चाहत्यांना हा निर्णय आवडलेला नाही. संतप्त पाठिराख्यांनी सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सला अनफॉलो केलं आहे.

त्यामुळे मुंबई इंडियन्सचे फॉलोअर्स घटले आहेत. या पार्श्वभूमीवर आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. एका फ्रेंचायजीनं रोहित शर्माशी संपर्क साधला होता. पण मुंबई इंडियन्ससोबत असलेल्या करारामुळे रोहितला संघाची साथ सोडता आली नाही.

हार्दिकला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी मुंबई इंडियन्स ऑल कॅश ट्रेड करणार असल्याच्या बातम्या येत होत्या. मुंबई इंडियन्स हार्दिकच्या संपर्कात असताना एका फ्रेंचायजीनं रोहित शर्माशी संपर्क साधला होता. दिल्ली कॅपिटल्सनं रोहित शर्माशी संपर्क साधला होता.

अपघातानंतर ऋषभ पंत आयपीएलमध्ये पदार्पण करणार आहे. पण तो इम्पॅक्ट प्लेअरच्या भूमिकेत दिसेल. पंतच्या अनुपस्थितीत डेविड वॉर्नरनं दिल्लीचं नेतृत्त्व केलं होतं. रोहित शर्मानं दिल्लीच्या संघात यावं आणि नेतृत्त्व करावं अशी संघ व्यवस्थापनाची इच्छा होती.

त्यासाठी त्यांचे प्रयत्नही सुरू होते. पण त्यासाठीचा व्यवहार होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांनी पंतलाच कर्णधारपदी ठेवण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सनं रोहितला कर्णधारपदावरुन हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही बातमी आली आहे.

एका फ्रेंचायजीनं रोहित शर्माला करारबद्ध करण्याची संधी पाहिली. त्यांनी मुंबई इंडियन्सशी संपर्क साधला. पण मुंबईनं त्यांची विनंती फेटाळली. त्या फ्रेंचायजीचं नाव दिल्ली कॅपिटल्स आहे. ते रोहितला करारबद्ध करण्यासाठी तयार होते, असं स्पोर्ट्स टुडेनं आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

मुंबईनं दिल्लीसोबत करार करण्यास नकार दिला. त्यांनी रोहितला संघात ठेवलं. पण हार्दिक पंड्याला संघात घेत त्याच्याकडे कर्णधारपद दिलं. त्यामुळे संघाला पाचवेळा विजेतेपद मिळवून देणाऱ्या रोहितला कर्णधारपद गमवावं लागलं. कर्णधारपद मिळणार असेल तरच मुंबई इंडियन्समध्ये परतेन अशी अट हार्दिकनं संघ व्यवस्थापनासमोर ठेवली होती.