लग्नाआधीच नवरा-नवरीवर काळाचा घाला; पुण्यातून फिरायला गेल्यानंतर घडली भयंकर घटना

सध्या रस्ते अपघाताच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. अनेकांना त्यात आपला जीवही गमवावा लागत आहे. अशीच एक घटना पुण्यातून समोर आली आहे. एका कारचा भीषण अपघात झाला असून त्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

देवघर धरणाच्या बॅक वॉटरमध्ये कार पडल्यामुळे हा अपघात झाला आहे. त्या कारमध्ये चौघे जण होते. पण त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. तर एकाचा जीव वाचला आहे. कारमध्ये असणारे चौघे मित्र-मैत्रिणी होते.

शनिवार-रविवार आला की अनेकजण फिरायला जात असतात. असाच प्लॅन त्यांनी केला होता. ते चौघे महाडला कारमधून चालले होते. सकाळी साडेसातच्या सुमारास ते भोर इथून महाडच्या दिशेला रवाना झाले होते.

अक्षय नावाचा तरुण हा गाडी चावत होता, तर त्याच्या बाजूला हर्षप्रीत बसलेली होती. तर गाडीच्या मागच्या बाजूला दोन मित्र बसलेले होते. अशात वारंवड गावात ते आले होते. त्यावेळी घाटात असताना अक्षयचे गाडीवरचे नियंत्रण सुटले.

त्यामुळे कार थेट दरीत कोसळली. पलट्या खाऊन ती कार ५० मीटर खोल धरणाच्या बॅक वॉटरमध्ये गेली. त्यामध्ये संकेत हा दरवाजा उघडून बाहेर पडला. पण इतरांना तसे करता आले नाही. त्यामुळे यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे.

अक्षय आणि हर्षप्रीत यांचा साखरपूडा झाला होता. लवकरच ते लग्न करणार होते. पण त्याच्याआधीच त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची भोर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पावसामुळे पुणे प्रशासनाने वरंधा घाट बंद केला होता. पोलिस बंदोबस्त देखील तिथे करण्यात आला होता. पण तरीही ते तिथून पुढे गेले होते. त्यामुळे पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.