शाळेत होतो म्हणून वाचलो आई वडिलांना तर…; दरड दुर्घटनेत बचावलेल्या मुलाने सांगितला भयानक अनुभव

सध्या राज्यातच नाही तर देशभरात मुसळधार पाऊस येत आहे. अनेक ठिकाणी तर पुरही आला आहे. तसेच दरड कोसळण्याचे प्रमाणही वाढत आहे. अशात रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीवर दरड कोसळली आहे.

लोकं रात्रीच्या झोपेत असतानाच ही भयानक घटना घडली आहे. त्यामुळे संपुर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये १०० पेक्षा जास्त लोक अकडले आहे. तर काही लोकांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. बचावपथक घटनास्थळी असून ते लोकांना मातीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढत आहे.

या घटनेतुन बचावलेल्या एका विद्यार्थ्याने नक्की काय घडलं हे सांगितलं आहे. त्याचे आईवडिलही या ढिगाऱ्याखाली अडकलेले आहे. तो म्हणाला की, आम्ही रोज पाच सहा मित्र शाळेत झोपायला जातो. नेहमीप्रमाणे कालही गेलो होतो.

पुढे तो म्हणाला की, शाळा थोडीशी लांब आहे. त्यामुळे तिथे दगड आले नाही. पण मोठा आवाज झाला होता. आम्ही शाळेत होतो म्हणून वाचलो पण आईबाबा घरी होते. त्यामुळे त्यांना पळताही आले नाही. आता तिथे घरही राहिलं नाहीये, फक्त मातीच राहिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इर्शाळवाडी येथे ६५ घरांची वस्ती आहे. त्यातील २५ ते ३० घरांवर रात्री दरड कोसळली. ही ३० घरे पुर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. ही घटना घडल्यानंतर तातडीने रुग्णवाहिका आणि बचाव पथकाला बोलवण्यात आले होते. त्यामुळे अनेकांचा जीव वाचला आहे.

६५ लोकांना आतापर्यंत यातून बाहेर काढण्यात आले आहे. तर १०० जण अजूनही त्या ढिगाऱ्याखाली अडकून बसलेले आहे. यामध्ये सहा जणांनी आपला जीवही गमावला आहे. सध्या घटनास्थळी ४० रुग्णवाहिका असून बचावपथक त्यांना वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे.