Narendra Modi : मंचावर दिग्गजांची फौज, मोदींनी फक्त तिघांशी गप्पा मारल्या, एकनाथ शिंदेंना तर थेट म्हणाले..

Narendra Modi : दिल्लीतील रामलीला मैदानावर भाजपच्या नवीन सरकारचा शपथविधी मोठ्या उत्साहात पार पडला. सकाळच्या उन्हातही मोदी-मोदीच्या घोषणांनी दुमदुमणारा जनसागर, भाजपचे लहरणारे झेंडे, ‘भारत माता की जय’च्या घोषणा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती या सोहळ्याची वैशिष्ट्ये ठरली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, चंद्राबाबू नायडू, एकनाथ शिंदे आणि इतर एनडीए नेते उपस्थित होते. नाराजीनाट्य टाळण्याचा प्रयत्न करणारे प्रवेश साहिबसिंह वर्मा आणि जबाबदारीच्या ओझ्याखाली दबलेल्या नवीन मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचाही या सोहळ्यात उल्लेखनीय सहभाग होता.
जातीय संतुलन साधण्याचा भाजपचा प्रयत्न
रेखा गुप्ता यांनी शपथ घेण्यापूर्वी कुटुंबीयांसह देवदर्शन करून नवीन जबाबदारीची सुरुवात केली. लाल साडी आणि सुषमा स्वराज यांच्या शैलीतील जॅकेट परिधान करत त्यांनी पक्षनेत्यांशी संवाद साधला. ‘रेखा या दिल्लीच्या भाग्यरेखा ठरतील’ असा विश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केला. भाजपने मंत्रिमंडळात जातीय संतुलन राखण्याचा प्रयत्न केला असून, सात मंत्र्यांमध्ये दोन ब्राह्मण, दोन पूर्वांचली, एक वैश्य (गुप्ता), एक शीख जाट आणि एक दलित चेहरा असे विविध समाज घटकांचे प्रतिनिधित्व आहे.
प्रवेश वर्मांची अप्रत्यक्ष नाराजी
प्रवेश वर्मा यांनी शपथ घेताना ‘साहिबसिंह वर्मा’ यांचा उल्लेख करत आपली अस्वस्थता अप्रत्यक्षरित्या दाखवली. मात्र माध्यमांशी बोलताना त्यांनी ‘मी बाबू बनून शपथविधीला चाललो आहे, कशाची नाराजी?’ अशी प्रतिक्रिया देत मनातील खदखद लपवण्याचा प्रयत्न केला.
योगी व नितीशकुमार अनुपस्थित
दिल्लीच्या राजकीय परिवर्तनाच्या या ऐतिहासिक क्षणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा अनुपस्थित होते. प्रयागराज कुंभमेळा आणि उत्तर प्रदेश विधानसभेच्या अधिवेशनामुळे योगी येऊ शकले नाहीत, तर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार प्रकृती अस्वास्थ्यामुळे गैरहजर होते. मात्र, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक आणि केशव प्रसाद मौर्य यांनी हजेरी लावली.
पंतप्रधान मोदींच्या तीन खास भेटी
शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान मोदींनी व्यासपीठावर येताच तीन प्रमुख नेत्यांशी विशेष संवाद साधला – एकनाथ शिंदे, पवन कल्याण आणि चंद्राबाबू नायडू.
- पवन कल्याण भगवी वस्त्रे परिधान करून आल्यामुळे मोदींनी हसत विचारले, ‘तुम्ही हिमालयात जाण्याच्या तयारीत आहात का?’ यावर कल्याण यांनी ‘त्यासाठी अजून वेळ आहे’ असे उत्तर दिले.
- एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधताना मोदींनी ‘काय एकनाथजी, सगळं ठीक ना?’ असे मराठीत विचारले. मात्र त्यापलीकडे त्यांच्या संभाषणाची अधिक माहिती बाहेर आली नाही.
भाजपचा सत्ता दुष्काळ संपुष्टात, नव्या पर्वाची सुरुवात
दिल्लीतील तब्बल २७ वर्षांच्या सत्ता दुष्काळानंतर भाजपने विजय मिळवत मुख्यमंत्रीपदावर पुनरागमन केले. मात्र, भाषणबाजी टाळत भाजपने हा सोहळा संयमित ठेवला. रेखा गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या नव्या मंत्रिमंडळाला मोठी जबाबदारी मिळाली असून, आगामी काळात त्यांच्या धोरणांवर सर्वांचे लक्ष राहणार आहे.