तुरुंगातून बाहेर आला गावगुंड, त्रासलेल्या गावकऱ्यांनी घेतला असा बदला की पोलिसही हादरले

राज्यातील काही ठिकाणी गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अनेक गावगुंड लोकांना त्रास देत आहे. त्यामुळे त्रासलेल्या लोकांना नक्की काय करावे हे कळेनासे झाले आहे. अशात वर्धामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

वर्धामध्ये एका ३० वर्षीय गुंडाला गावकऱ्यांनी काठ्यांनी बेदम मारहाण केली आहे. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. तो नुकताच तुरुंगातून जामिनावर सुटला होता. गावकरी त्याला खुप त्रासले होते. त्यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी असे कृत्य केले आहे.

संबंधित घटना ही हिंगणघाट तालुक्यातील सेलू भागातील आहे. बुधवारी रात्रीच्या वेळेस गावकऱ्यांनी त्याच्यावर हल्ला केला होता. त्यामध्ये तो तरुण इतका जखमी झाला की त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चारजणांना अटक केली आहे, तर इतर गावकऱ्यांचा शोध सुरु आहे.

आकाश उईके असे त्या गुंडाचे नाव होते. चोरी, गुंडगिरी, लोकांना त्रास देण्याचे काम तो करत असायचा. त्याच्यावर पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल झालेले होते. त्यामुळे त्याला तुरुंगातही जावे लागले होते.

अशात चार दिवसांपूर्वी त्याला तुरुंगातून जामीन मिळाला होता. त्यामुळे तो परत गावात आला होता. बुधवारी रात्रीच्या सुमारास तो दारु मागण्यासाठी एका दारुविक्रेत्याकडे गेला होता. पण दारु न दिल्यामुळे तो गावकऱ्यांना त्रास देऊ लागला.

एका तरुणाची त्याने बाईक पाडली. त्यानंतर तो ग्रामपंचायतीच्या चौकात पोहचला. तिथल्या लोकांशीही तो वाद घालू लागला. त्यावेळी संतापलेल्या एका नागरिकाने त्याला वीट मारुन जखमी केले. त्यानंतर तिथे असलेल्या गावकऱ्यांनी त्याच्यावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला.

गावकरी त्याच्या त्रासाला खुप कंटाळले होते. त्यामुळे कुठलाही विचार न करता ते त्याला मारत होते. या हल्ल्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे त्याला रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.