दलित तरुणांना कपडे काढून झाडाला उलटं टांगलं आणि…; नगरमधील निर्दयी घटनेने महाराष्ट्र हादरला

श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे तीन दलित तरुणांना झाडाला बांधून मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. शेळी आणि कबुतर चोरल्याच्या संशायावरून ही मारहाण केल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेनंतर दलित संघटना आक्रमक झाल्या आहेत. हरेगाव येथे बंद पाळून या घटनेचा निषेध करण्यात आला. नंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. उंदीरगाव येथील गलांडे वस्तीवरील शेळी आणि चार कबुतरे या तरुणांनी चोरल्याचा गलांडे यांना संशय होता.

यामुळे या तरुणांना मारहाण करण्यात आली. तीन तरुणांना कपडे काढून झाडाला उलटे टांगले. चोरीसंबंधी विचारणा करून त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली. युवराज गलांडे, नानासाहेब गलांडे, मनोज बोडखे, दुर्गेश वैद्य यांनी या तीन तरुणांना कपडे काढून झाडाला उलटे टांगले.

यामध्ये शुभम वाघाडे, कुणाल मगर, ओम गायकवाड हे तरुण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हे तरूण आणि त्यांचे कुटुंबीय मोलमजुरी करून आपली उपजीविका करतात. यातील आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी, त्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, असे कुटूंबाचे म्हणणे आहे.

दरम्यान, कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. त्यामुळे नागरिकांनी संयम ठेवावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच
श्रीरामपूरमधील रिपब्लिकन संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली.