Satara Double Murder : शेतकरी दाम्पत्य रात्री शेतात पाणी द्यायला गेले अन् घडलं भयंकर, सातारा हादरला…

Satara Double Murder : सातारा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. साताऱ्यातील माण तालुक्यातील आंधळी गावात पती पत्नीचा अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार करुन खून केल्यानं खळबळ उडाली आहे.

याबाबत अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिकांना पाणी देण्यासाठी रात्री शेतात ते गेले होते. संजय रामचंद्र पवार (वय ४९) आणि मनिषा संजय पवार (वय ४५) असे खून झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

हे दाम्पत्य शिवारात पिकाला पाणी देण्यासाठी रात्री गेले होते. यावेळी रात्री दहा ते अकराच्या दरम्यान, अज्ञातांनी धारदार शस्त्राने त्यांच्या डोक्यावर, मानेवर, गळ्यावर वार करून या दाम्पत्याची निर्घृण हत्या केली आहे. सकाळी याबाबत माहिती पुढे आली.

सकाळी शेतकरी शेतात जात असताना संजय व मनिषा पवार दाम्पत्याचे रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह आढळून आले. नागरिकांनी मृतदेह बघताच आंधळी गावच्या पोलीस पाटलांना या घटनेची माहिती दिली.

नंतर दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस पथकासोबत घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी दहिवडी पोलिसांना काही धागेदोरे मिळाले आहेत. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

दरम्यान, दाम्पत्याच्या हत्येमागे शेताचा वाद की अन्य कारण आहे हे संशयिताला ताब्यात घेतल्यानंतरच स्पष्ट होईल, असं पोलिसांनी सांगितले आहे. याठिकाणी संशयिताच्या तपासासाठी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले आहे.