समृद्धी महामार्गावर भीषण दुर्घटना, १४ जणांचा जागीच मृत्यू तर ३ जण गंभीर जखमी

गेल्या काही महिन्यांपासून समृद्धी महामार्ग राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. या महामार्गावर अनेक अपघात झाले असून त्यामध्ये अनेकांचा जीवही गेला आहे. आता पुन्हा एकदा एक भीषण घटना समृद्धी महामार्गावर घडली आहे.

ठाण्यातील शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गाचं काम सुरु असताना भीषण दुर्घटना घडली आहे. त्यामध्ये १४ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. क्रेन पडल्यामुळे त्याच्या खाली दबून गेल्यामुळे कामगारांचा मृत्यू झाला आहे.

घटना घडल्यानंतर तातडीने बचावपथकाने त्याठिकाणी धाव घेतली होती. जे लोक यात गंभीर जखमी झालेत त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आहे. या घटनेमध्ये १४ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ३ जण जखमी झाले आहे, अशी माहिती समोर आली आहे.

रात्री ११ ते १२ च्या दरम्यान हा अपघात झाला. त्यानंतर १ वाजता आपत्ती व्यवस्थापनाला याबाबत माहिती मिळाली होती. हा अपघात सातगाव पुल, सरळ आंबेगाव, शहापूर याठिकाणी झाला आहे. समृद्धी महामार्गाच्या ब्रीजचे काम सुरु असताना हा अपघात झाला आहे.

ब्रीजचे काम सुरु असताना तिथे काम करणाऱ्या कामगारांच्या अंगावर ती क्रेन पडली होती. हा अपघात इतका भीषण होता त्यामध्ये १४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ३ जण जखमी झाले आहे. घटना घडल्यानंतर स्थानिक लोकं मदतीला धावून आले होते. त्यानंतर लगेचच बचाव पथकही आले असून त्यांनी मदतकार्याला सुरुवात केली होती.

रात्रीच्या वेळी क्रेनच्या मदतीने गर्डर बसवण्याचे काम सुरु होते. पण त्यावेळी गर्डर बसवणारी क्रेन अचानक खाली कोसळली आणि त्याखाली असणाऱ्या १४ लोकांचा जागीच मृत्यू झाला. हे कॉन्ट्रॅक्ट नवयुगा कंपनीला देण्यात आले असून ९० ते १२० फुट उंचीचा हा पुल आहे.