Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेला मिळालं नवीन वर्षाचं गिफ्ट, टिमच्या कर्णधारपदी निवड

Ajinkya Rahane : भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्त्व केलेल्या अजिंक्य रहाणेला एक मोठी जबाबदारी आता मिळाली आहे, रहाणे आता या संघाचे कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच याबाबत माहिती समोर आली आहे.

याबाबत माहिती अशी की, रणजी ट्रॉफीसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने पहिल्या दोन सामन्यांसाठी आपला संघ जाहिर केला आहे. यामध्ये भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेला संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे.

सलामीवीर पृथ्वी शॉ ऑगस्टमध्ये झालेल्या गुडघ्याच्या दुखापतीतून अजून बाहेर आला नाही. मुंबई ५ जानेवारीपासून रणजी ट्रॉफी मोहिमेला बिहार विरुद्ध पाटणा येथील मोईन उल हक स्टेडियमवर सुरुवात करेल आणि १२ जानेवारीपासून एमसीए शरद पवार क्रिकेट अकादमी मैदानावर आंध्रचा सामना करेल.

दरम्यान, मुंबई रणजी करंडक स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. असे असले तरी २०१४ पासून संघाने या स्पर्धेचे जेतेपद जिंकलेले नाही. मुंबईला गेल्या मोसमात बाद फेरी गाठण्यात अपयश आले होते.

यामध्ये सात सामन्यांतून केवळ तीन विजयांसह एलिट गट ब मध्ये चौथ्या स्थानावर राहिले. ८८ सीझनमध्ये ३९ विजेतेपदांसह मुंबई रणजी करंडक स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. सरफराज खान, शिवम दुबे, सुवेद पारकर, शम्स मुलानी, तुषार देशपांडे आणि धवल कुलकर्णी यांनी २०२४ च्या सीझनसाठी चांगली टीम तयार केली आहे.

जयस्वाल हे एकमेव हाय-प्रोफाइल नाव आहे जे पहिल्या दोन सामन्यांमधून गायब आहे. जुलै २०२३ मध्ये पदार्पण केल्यापासून तो राष्ट्रीय संघाचा भाग आहे. दरम्यान, सरफराज खानचा धाकटा भाऊ मुशीर खान संघात नाही. तो दक्षिण आफ्रिकेतील आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या U19 संघात सामील झाला आहे.