भाजपची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, पुण्यातील बड्या महिला नेत्याने केले ‘हे’ गंभीर आरोप

राज्यात भाजपचे काही नेते अंतर्गत गटबाजीमुळे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातलेच एक नाव म्हणजे भाजप नेत्या मेधा कुलकर्णी. त्या नाराज असल्याची चर्चा होती. पण आता त्यांनी जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली आहे.

पुण्यातील चांदणी चौकाचे उद्धाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यामुळे भाजपने मोठमोठे होर्डिंग्स पुण्यात लावले आहे. त्यावर भाष्य करत मेधा कुलकर्णी यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

मेधा कुलकर्णी यांनी एक ट्विटरवर पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी त्या होर्डिंगचा फोटो टाकला आहेत. तसेच कॅप्शनमध्ये माझ्यासारख्या निष्ठावंत नेत्याचं अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न आहे का? असे त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी एक मोठी पोस्टही लिहीली आहे.

मेधा कुलकर्णी यांची पोस्ट-
असे निष्ठावंतांचे डावललेले जिणे
माझ्यावरील कुरघोडया, डावलणे याबद्दल मी कधी जाहीर वाच्यता केली नव्हती. विश्वासात न घेता अचानक निर्णय घेतले तेव्हाही.. पण आता दुःख मावत नाही मनात.. वाटले बोलावे तुमच्याशी. चांदणी चौक उद्घाटन कार्यक्रमाची कोथरूडमधील पत्रके पहिली आणि खूप वाईट वाटले.

चांदणी चौक या विषयाचे सर्वस्वी श्रेय नितीन गडकरीजी आणि देवेंद्र फडणवीसांना आहे. पण मुळातच त्यांच्याकडे हा विषय नेला कोणी? स्वतः आदरणीय गडकरीजी काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात जाहीर भाषणात म्हणाले की, तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी ताईंच्या सांगण्यावरून मी हा मुद्दा घेतला”.

अनेक असे संदर्भ देता येतील की ज्यात ‘कोथरूडचे आधुनिक कुठलेच या विषयी सहभागी नव्हते, तेव्हापासून सतत पाठपुरावा केला होता. आता मात्र सर्व श्रेय एकट्याचेच वागणारे कोथरूडचे सद्य नेते.. माझ्या सारख्यांचे अस्तित्वच मिटवून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का?

मध्यंतरी आदरणीय मोदी जी, आदरणीय अमित शाह जी पुण्यात येऊन गेले. ठराविक लोकांना प्रोटोकॉल सोडून ‘सर्व ठिकाणी’चे पास होते. मी राष्ट्रीय पदावर असून, विनंती करूनही मला दिला नाही.

साधे कोथरूडच्या मंडल अध्यक्ष पदाच्या प्रक्रियेतही समाविष्ट श्रेणी मध्ये मी अपेक्षित नसेन तर याचा अर्थ स्थानिकांना मी नको आहे. गेली अनेक वर्षे मी हे सहन करीत आहे. त्या त्या वेळी गोष्टी वरीष्ठांपुढे मांडल्या आहेत.

देशापुढील आव्हाने, त्यासाठी करायचे अपेक्षित संघटन सोडून हे स्वतःच्या स्वार्थासाठी विघटनाचे, काटाकाटीचे राजकारण करत आहेत. माझ्या सारख्या निष्ठावान कार्यकर्तीला जाणीव झाली की माझी काही किंमत नाही आहे.

माझ्या बाबत त्यांना असे करणे सोपे जाते. माझ्याकडे मसल पॉवर नाही. मी एका सामान्य कुटुंबातून आलेली, विचारधारा धरून निष्ठेने काम करणारी कार्यकर्ती आहे. एका वैचारिकतेतून राजकारणात प्रवेश केला. आणि अगदी मनापासून सर्व समाजातील लोकांची कामे केली. आजही जे सोपवले आहे ते करीतच आहे. त्यावर असा बोळा फिरवला जातो आहे हे आता मात्र असह्य होऊन गेले आहे.