चौघांना मारण्याआधी कॉन्स्टेबलने दिली होती धमकी; इथे रहायचं असेल तर मोदींना अन् योगींनाच…

सोमवारी पहाटे जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये गोळीबाराची घटना घडली होती. त्यामध्ये एका माथेफिरु कॉन्स्टेबलने चार जणांवर गोळीबार केला होता. त्यामध्ये चौघांचा मृत्यू झाला होता. चार जणांमध्ये तीन प्रवासी होते, तर एक वरिष्ठ अधिकारी टीकाराम हे होते.

संतापलेल्या कॉन्स्टेबलने तीन डब्बे फिरुन १२ गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर त्याने गाडीची चेन ओढली होती. गाडी हळू झाल्यानंतर त्याने डब्यातून उडी मारली आणि तो पळून गेला. पण त्यानंतर त्याला लगेचच अटक करण्यात आली आहे.

मीरा रोडवरील पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. मानसिक तणावात त्याने असे कृत्य केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले होते. अशात त्या कॉन्स्टेबलचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याचा तपास पोलिस करत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये तो असे म्हणताना दिसून येत आहे की अगर वोट देना है, हिंदुस्थान में रहना है तो मोदी और योगी इन्हे दो और आपके ठाकरे. त्याच्या या व्हिडिओचा तपासही पोलिस करताना दिसून येत आहे.

या हल्ल्यामध्ये टीकाराम मीणा, अब्दुल कादरभाई मोहम्मद हुसैन, अख्तर अब्बास अली याच्यासह आणखी एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. त्या प्रवाशांमध्ये आणि चेतन सिंगमध्ये वाद झाले होते. त्यामुळे त्याने त्यांच्यावर थेट बंदूक उगारली होती.

टीकाराम मीणा हे त्याला शांत राहण्यास सांगत होते. त्यामुळे संतापलेल्या कॉन्स्टेबलने टीकाराम यांना गोळी मारली. त्यानंतर तीन प्रवाशांनाही गोळी मारत त्यांची हत्या केली. बदली झाल्यामुळे तो आधीच मानसिक तणावात होता. अशातच त्याचे प्रवाशांसोबत भांडण झाल्यामुळे त्याने असे केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.