‘पुन्हा लग्न करतांना कुठल्या मुलीला फसवु नका, आईची काळजी घे’, पूनमने ३ वर्षाच्या चिमुकलीसह रेल्वेतुन मारली उडी

औरंगाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी तीन वर्षाच्या मुलीसह स्वतः उडी मारत एक महिलेने आत्महत्या केली आहे. पूनम गणेश विसपुते, शांभवी विसपुते असे माय-लेकीचे नाव आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

या महिलेने उडी मारण्याआधी भावाला, पतीला मेसेज पाठवला होता. यामध्ये सासूबाई पोराला आता तरी मांडीवरून खाली उतरवा आणि दुसरे लग्न करताना त्या मुलीला फसवू नका, असे म्हटले आहे. सासरच्या छळाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जात आहे.

सासरच्या छळाला कंटाळून पूनम सहा महिन्यांपूर्वी आईकडे आली होती. पूनमचे २०१८ मध्ये नाशिक जिल्ह्यातील गणेशसोबत लग्न झाले होते. गणेश परराज्यातील एका खाजगी कंपनीत कामाला आहे. 

तिने पाठवलेल्या मेसेजमध्ये म्हटले आहे की, माझ्या मरणाला मी आणि मीच जबाबदार आहे. यात माझ्या सासरच्यांची चूक नाही. माहेरच्यांची नाही. भावजी, माई लहान बहीण लहान आहे. तिला सांभाळून घ्या. काही चुकत असेल तर माफ करा.

तसेच भैय्या तुझ्याशिवाय मम्मीला कुणी नाही. तिची काळजी घे. तुझी पण काळजी घे. माझ्यानंतर शामूला कोणी नाही. त्यामुळे मी तिला सोबत घेऊन जाते. मावशी, आई, आजी मला माफ करा. जगण्यासाठी पैसा लागत नाही, तर आनंद लागतो.

सासूबाई पोराला आता तरी मांडीवरून खाली उतरवा आणि दुसरे लग्न करताना त्या मुलीला फसवू नका. आय एम सो सॉरी फॅमिली, असा मेसेज करत तिने आयुष्य संपवले आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

पूनमने आपली तीन वर्षांची मुलगी शंभवीला घेऊन घरातून निघून गेली. तिचा शोध घेत असतानाच तिने आपल्या मुलीसह आत्महत्या केल्याची माहिती कुटुंबियांना मिळाली. यामुळे तिला एकच धक्का बसला.