वडिलांच्या निधनानंतर इंडस्ट्रीतील लोकांचा पाठिंबा मिळाला का? गश्मीर म्हणाला, मला फक्त…

प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळे संपुर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली होती. ते शेवटच्या काळात फ्लॅटमध्ये एकटेच राहत होते. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते.

रवींद्र महाजनी यांचा मुलगा गश्मीर महाजनीला लोकांच्या टीकेला सामोरे जावे लागले होते. गश्मीर त्याच्या वडिलांकडे दुर्लक्ष करत होता, अशी टीका लोक त्याच्यावर करत होते. आता त्याने मराठी इंडस्ट्रीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

गश्मीर हा सोशल मीडियावर खुप सक्रीय असतो. पण त्याच्या वडिलांच्या निधनानंतर तो सक्रीय नव्हता. पण आता त्याने इंस्टाग्रामवर आस्क मी क्वेश्चनचं सेशन घेतलं होतं. त्यामध्ये चाहत्यांनी त्याला अनेक प्रश्न विचारले असून त्याने त्या प्रश्नांची उत्तरे दिली आहे.

त्याच्या या सेशनमध्ये एकाने त्याला मराठी इंडस्ट्रीबाबत प्रश्न विचारला होता. या कठीण काळात तुला मराठी इंडस्ट्रीने सपोर्ट केला का? असा प्रश्न एका चाहत्याने त्याला विचारला. त्याचे त्याने उत्तर दिले असून ते उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.

मराठी इंडस्ट्रीतील काही मोजक्या आणि समजूतदार लोकांनीच मला या कठिण काळात साथ दिली. विशेष म्हणजे प्रवीण तरडे, रितेश देशमुख आणि मृणमयी देशपांडे. ही फार चांगली माणसं असून त्यांना विसरणं अशक्य आहे, असे गश्मीरने म्हटले आहे.

वडिलांच्या निधनामुळे गश्मीरवर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. त्यावरही त्याने प्रतिक्रिया दिली होती. ते एक स्टार होते, त्यांना स्टारच राहूद्या. मी आणि माझ्यासोबत असणारे लोक शांत राहत आहे. तुम्हाला जर माझा द्वेष करायचा तर तुम्ही तो करु शकतात, असे तो म्हणाला होता.

तसेच माझ्या वडिलांच्या आत्म्याला शांती मिळो. ते माझे वडील होते आणि माझ्या आईचे पती सुद्धा होते. आम्ही त्यांना तुमच्यापेक्षा जास्त ओळखतो. कदाचित भविष्यात मी सगळ्या गोष्टींचा नक्कीच उलगडा करेल, असेही गश्मीरने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये सांगितले होते.