गश्मीर महाजनीला ट्रोल करणाऱ्यांना पत्नी गौरीने दिले सडेतोड उत्तर; म्हणाली, टोमण्यांच्या भट्टीमध्ये…

काही आठवड्यांपूर्वी प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन झाले होते. ते त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या काही महिन्यांमध्ये एकटेच राहत होते. एका फ्लॅटमध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या निधनामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली होती.

रवींद्र महाजनी यांच्या मृत्यूमुळे त्यांचा मुलगा गश्मीर महाजनीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. गश्मीरने रवींद्र महाजनी यांच्याकडे लक्ष दिले नाही, असे म्हणत लोकांनी त्याला ट्रोल केले होते. पण मी त्यांचा मुलगा होतो. तुमच्यापेक्षा जास्त मी त्यांना ओळखतो असे म्हणत गश्मीरने टीका करणाऱ्यांना उत्तर दिले होते.

तसेच योग्य वेळ आल्यावर भविष्यात मी नक्कीच याबाबत खुलासा करेन असेही गश्मीर महाजनीने म्हटले होते. रवींद्र महाजनी यांच्या जाण्यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यातून ते सावरण्याचा प्रयत्न करत आहे. या दु:खातही काही मोजक्याच लोकांनी त्याला साथ दिली होती.

अशात गश्मीरच्या पत्नीने पहिल्यांदा या ट्रोलिंगवर भाष्य केलं आहे. गश्मीरला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. तरी गश्मीरची पत्नी गौरी ते सहन करत होती. पण आता तिने यावरचे मौन सोडले आहे.

गौरीने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. त्यामध्ये गश्मीर एका पुजेत बसलेला आहे. त्या फोटोच्या खाली कॅप्शन देत तिने ट्रोलर्सला उत्तर दिले आहे. टोमण्यांच्या भट्टीमध्ये तापलेला माणूस राख नाही तर सोनं बनतो. मला कायमच गर्व आहे की तु माझा पती आहे, असे कॅप्शन तिने दिले आहे.

सोशल मीडियावर तिची पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. कारण तिने यातून ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच उत्तर दिले आहे. तिच्या या पोस्टवर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. लोकांचं ऐकू नकोस तुला हवं तेच कर लोकं तर टोमणे मारतच राहतील असेही काही लोकांनी म्हटले आहे.