Jalna News: आजपासून मी कोणाला भेटणार नाही!! भावाला शेवटचा फोन अन् थोड्यावेळात भयंकर घटना…

Jalna News : जालन्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरातील मोती तलावामध्ये एका अठरा वर्षीय तरुणाने उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

याबाबत माहिती अशी की, जालना शहरातील मंठा चौफुली येथील रहिवासी असलेल्या १८ वर्षीय कुणाल किशोर कांबळे यांनी दुपारच्या सुमारास त्याच्या भावाला फोन केला. आजच्यानंतर मी कोणाला भेटणार नाही, असे म्हणत फोन कट केला. या अचानक आलेल्या फोनच्या धक्क्यातून सावरत त्याने याची माहिती घरच्यांना व नातेवाईकांना दिली.

त्यानंतर घरच्यांनी व नातेवाईकांनी कुणालचा शोध घेणे चालू केले. त्याचे मित्र यांना विचारपूस केली. पण कुणाकडून काहीच माहिती मिळाली नाही. यामुळे कुटूंब पूर्णपणे घाबरून गेले होते. नंतर या घटनेची माहिती पोलिसांना दिली गेली.

पोलिसांनी तपास सुरू केला असता एका युवकाने शहराच्या मोती तलावात उडी घेतल्याची माहिती त्यांना मिळाली. पोलिसांनी लगेच मोती तलावाकडे धाव घेऊन नागरिकांच्या मदतीने या तरुणाचा शोध घेतला. यावेळी मोठी गर्दी झाली होती.

दरम्यान, दुर्दैवाने तलावात कुणाल किशोर कांबळे यानेच उडी मारल्याची खात्री झाली. यामुळे कुटूंबाला एकच धक्का बसला. या तरुणाने आत्महत्या का केली याचा शोध घेण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले असून पोलिस विविध अँगलने याचा तपास करत आहे.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्याकरिता पाठविला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.