धोंड्यांसाठी जावयाची वाट बघून बायको-सासू झोपल्या, रात्री तो आला अन् सगळंच संपलं; भयानक घटनेने नगर हादरलं

अहमदनगर जिल्ह्यातील राहूरीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आले. कौटुंबिक वादावरुन एका जावयाने आपल्या पत्नीसह आपल्या सासूची हत्या केली आहे. त्यानंतर त्याने स्वत:लाही संपवले आहे. या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

मंगळवारी रात्री ही घटना घडली आहे. सागर साबळे असे त्या जावयाचे नाव होते. तो कात्रड येथील सासुरवाडीमध्ये घरजावई म्हणून राहत होता. त्याने मंगळवारी रात्री पत्नी नुतन साबळे (२३) आणि सासू सुरेखा दांगट (४५) यांची हत्या केली.

लोखंडी रॉड मारुन सागरने त्या दोघींची हत्या केली होती. त्यानंतर आपल्या लहान मुलीला घेऊन तो नातेवाईकांकडे गेला होता. तिथे त्या लहान मुलीला सोडून तो फरार झाला. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.

पोलिसांनी याप्रकरणी सागरचा शोध सुरु केला. अशात गुरुवारी नगरजवळच्या एमआयडीसी परिसरात एका झाडाला त्याने स्वत:ला लटकवून जीव दिल्याचे पोलिसांच्या समोर आले. कौटुंबिक वादातून त्याने असे केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सागर हा पत्नीसोबत तिच्या घरी राहत होता. तो आधीपासून पत्नीला सासरी येण्यासाठी सांगत होता. पण ती ऐकत नसल्यामुळे तो तिच्या घरी येऊन राहत होता. यावरुन त्याचे पत्नी आणि सासूसोबत सतत वाद होत होते.

तो तिच्या घरी राहून एमआयडीसीची नोकरी करत होता. १५ ऑगस्टला सासूने धोंड्याचे खास जेवण बनवले होते. त्यादिवशी दिवसभरात अनेक पाहूणे येऊन गेले पण सागर घरीच आला नाही. त्यामुळे सर्वजण झोपले होते.

अशात रात्री उशिरा सागर घरी आला आणि त्याने त्या दोघींची हत्या केली. त्यानंतर त्याने आपल्या लहान मुलीला घेतले आणि तिथून तो फरार झाला. त्याने आपल्या लहान मुलीला नातेवाईकांकडे सोडले. नातेवाईकांना संशय आल्यामुळे ते दांगट यांच्या घरी आले तर हा सर्वप्रकार समोर आला.

नातेवाईकांनी तातडीने पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला. पोलिस सागरचाही शोध घेत होते. शोध घेत असताना सागरने आपले जीवन संपवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या घटनेमुळे संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.