Arvind Kejriwal : दिल्लीकरांचा केजरीवालांना झटका; आपच्या पराभवाची अन् भाजपाच्या विजयाची 5 मोठी कारणं

Arvind Kejriwal : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठे यश मिळवले असून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पराभवाचा सामना करावा लागला. नवी दिल्ली मतदारसंघात भाजपचे परवेश वर्मा यांनी त्यांचा पराभव करत मोठी राजकीय उलथापालथ घडवली. तसेच, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना देखील जंगपुरा मतदारसंघात भाजपच्या तरविंदरसिंग मारवाह यांनी हरवले.
सध्या निवडणूक निकालांमध्ये भाजप 48 जागांवर, तर आम आदमी पक्ष 22 जागांवर आघाडीवर आहे. आपच्या दोन प्रमुख नेत्यांचा पराभव हा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
आम आदमी पक्षाच्या पराभवाची आणि भाजपच्या विजयाची 5 महत्त्वाची कारणे
- काँग्रेससोबत युतीचा अभाव आणि मतविभाजन
आम आदमी पक्षाने काँग्रेससोबत आघाडी करण्यास नकार दिला, त्यामुळे मुस्लिम मतदारांचे विभाजन झाले. तसेच, असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएम पक्षामुळे भाजपला अप्रत्यक्ष फायदा झाला. परिणामी, मुस्लिम बहुल भागातही भाजपने चांगली आघाडी घेतली.
- भ्रष्टाचाराचे आरोप आणि तुरुंगवास
या निवडणुकीत भ्रष्टाचार हा मोठा मुद्दा ठरला. केजरीवाल, मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन आणि संजय सिंह यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लागले आणि त्यांना तुरुंगात जावे लागले. भ्रष्टाचारविरोधी चळवळीमधून जन्माला आलेल्या पक्षाचेच नेते तुरुंगात जात असल्याने जनतेमध्ये नकारात्मक भावना निर्माण झाली.
- विकासकामांचा अभाव आणि शीश महल वाद
दिल्लीतील पायाभूत सुविधा आणि विकासकामांमध्ये अपेक्षित सुधारणा दिसली नाही. केजरीवाल सरकारवर आरोप झाले की त्यांनी दिल्लीतील समस्यांवर तोडगा काढण्याऐवजी केंद्र सरकारला दोष देत राहिले.
याशिवाय, मुख्यमंत्री निवासस्थानावर कोट्यवधी रुपये खर्च केल्याच्या आरोपांमुळे ‘शीश महल’ वाद निर्माण झाला, ज्याचा फटका आम आदमी पक्षाला बसला.
- केवळ मोफत योजनांवर भर, पण भ्रष्टाचाराविरोधातील रोष अधिक प्रबळ
केजरीवाल यांनी मोफत वीज, पाणी आणि महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याच्या घोषणा केल्या. मात्र, दिल्लीकरांना भ्रष्टाचार आणि अपुऱ्या विकासामुळे अस्वस्थ वाटत होते, त्यामुळे त्यांनी भाजपच्या बाजूने कौल दिला.
- अपूर्ण आश्वासने आणि लोकांचा नाराजीचा सूर
रिक्षाचालक आणि महिला मतदारांमध्ये नाराजी दिसून आली. महिलांना आर्थिक मदतीचे आश्वासन देण्यात आले होते, पण पंजाबमध्येही असेच आश्वासन पूर्ण झाले नाही, हे लोकांनी लक्षात ठेवले. याउलट, भाजपने मध्य प्रदेश आणि इतर राज्यांत दिलेली आश्वासने पूर्ण केल्याने मतदारांचा कल त्यांच्याकडे वळला.
निवडणुकीचा निकाल आणि भविष्यातील राजकीय दिशा
भाजपचा विजय आणि आम आदमी पक्षाचा पराभव यामुळे दिल्लीच्या राजकारणात मोठे परिवर्तन झाले आहे. केजरीवाल आणि सिसोदियांच्या पराभवानंतर आम आदमी पक्षाची पुढील रणनीती काय असेल, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.