अजित पवारांची सत्तेत एंट्री अन् राहूल नार्वेकरांचा मोठा निर्णय, शिंदेंसह १६ आमदारांना…

राज्यात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे. असे असतानाच आता विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना नोटीस बजावणार आहे.

एकनाथ शिंदे यांनी गेल्यावर्षी बंड केलं होतं. त्यांच्यासोबत काही आमदारही होते. गेल्यावर्षी जून महिन्यात त्यांनी केलेल्या बंडामुळे व्हीप लागू करण्यात आला होता. पण व्हीपचं पालन न केल्यामुळे शिंदेंसह १६ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी असे ठाकरे गटाने म्हटले होते.

ती कारवाई करण्यासाठी तत्कालीन विधानसभा अध्यक्षांकडे याचिका देखील दाखल करण्यात आली होती. आता त्याच याचिकेवर सध्याचे विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर हे निर्णय देणार आहे. सुप्रिम कोर्टाने याबाबत निर्णय घेतला होता.

आता त्याचसंदर्भात राहूल नार्वेकर हे १६ आमदारांना १ ते २ दिवसामध्ये नोटीस बजावणार असल्याचे म्हटले जात आहे. विधानसभा अध्यक्षांना हा निर्णय १० ऑगस्टपूर्वी घ्यावा लागणार आहे. कारण १० ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला ९० दिवस पूर्ण होणार आहे.

विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाने शिवसेनेच्या १६ आमदारांच्या निलंबन याचिका, सुप्रिम कोर्टाचा निकाल यांचा अभ्यास केला आहे. सुप्रिम कोर्टाने या निकालबाबत कुठलीही मुदत दिलेली नाही. पण मणिपूर केसमध्ये सुप्रिम कोर्टाने ९० दिवसांचा कालावधी दिला होता.

मणिपूरच्या केसचा आढावा देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते सुनिल प्रभू यांनी कोर्टात धाव घेतली आहे. त्यांनी दिलेल्या याचिकेनुसार दोन आठवड्यात निकाल देण्याचे निर्देश द्यावे अशी मागणी केली आहे. त्यामुळे राहूल नार्वेकर लवकरच १६ आमदारांना नोटीस पाठवण्याची शक्यता आहे.