उद्धव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दणका; शिंदेंविरुद्धच्या दोन्ही याचिकांबाबत म्हणाले…

शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरांना निर्णय घेण्यास सांगितले होते. त्यानंतर त्यांनी आमदारांना नोटीशीही पाठवल्या होत्या. पण त्याला उत्तर लगेच उत्तर देण्यास शिंदेंच्या आमदारांनी नकार दिला होता.

आम्हाला मुदत वाढवून हवी आहे, अशी मागणी शिंदेंच्या आमदारांनी केली होती. त्यामुळे राहूल नार्वेकरांनी २ आठवड्यांची मुदत त्यांना वाढवून दिली आहे. त्यामुळे १६ आमदारांच्या अपात्रेबाबतचा निकाल आणखी लांबणीवर पडला आहे.

आता ठाकरे गटाने याप्रकरणी आणि निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पण सर्वोच्च न्यायालयाने याबाबत लगेच सुनावणी करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे ठाकरेंना पुन्हा धक्का बसला आहे. दोन्ही याचिकांची सुनावणी आता दोन-चार आठवडे लांबणीवर पडणार आहे.

१६ आमदारांच्या अपात्रेबाबतचा निर्णय राहूल नार्वेकरांनी घ्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. पण सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाला ३ महिने होतील. तरीही नार्वेकरांनी याबाबत निर्णय दिलेला नाही. त्यामुळे ठाकरे गटाने याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

तसेच निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह या दोन्ही गोष्टी एकनाथ शिंदे गटाला दिल्या आहेत. शिंदेंकडे संख्याबळ जास्त आहे हे म्हणत निवडणूक आयोगाने शिंदेंना पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले आहे. त्याच्याविरोधातही ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

आता सर्वोच्च न्यायालयाने या दोन्ही याचिकांवर भाष्य केलं आहे. सध्या तरी या याचिकांवर सुनावणी करता येणार नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे या दोन्ही याचिकांवर २ ते ४ आठवड्यांनंतर सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.