Insurance : ८० लाखांचा विमा लाटण्यासाठी कार पेटवली, भिकाऱ्याला जाळून केला स्वतःच्या मृत्यूचा बनाव; १७ वर्षांनी ‘असा’ सापडला आरोपी

Insurance : गुजरातमध्ये 80 लाख रुपये आणि एका व्यक्तीच्या हत्येची घटना समोर आली आहे, ज्यामध्ये जगाच्या नजरेत मेलेली व्यक्ती 17 वर्षांनंतर अचानक जिवंत सापडली आहे.

खरेतर, उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीला अहमदाबादमधून भिकाऱ्याची हत्या करून 80 लाख रुपये विमा मिळवून देण्यासाठी आणि गेल्या 17 वर्षांपासून नवीन ओळखीसह जगत असल्याचा बनाव केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी ही माहिती दिली.

पोलिसांनी जारी केलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे की, एका विशिष्ट माहितीच्या आधारे क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील भट्टा-परसौल गावातील रहिवासी अनिल सिंग चौधरी (३९) याला अहमदाबाद शहरातील निकोल परिसरातून अटक केली.

अहवालामध्ये म्हटले आहे की 31 जुलै 2006 रोजी आग्रा येथील रकाबगंज पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली होती जेव्हा अपघातानंतर कारला आग लागल्याने कार चालकाचा मृत्यू झाला होता.

त्यावेळी चालकाचे नाव अनिल सिंग चौधरी असे असून त्याच्या वडिलांनी त्याची ओळख पटवली. त्यात म्हटले आहे की, अलीकडेच अहमदाबाद क्राइम ब्रँचला आपल्या सूत्रांकडून कळले की अनिल सिंह चौधरी जिवंत आहे आणि त्याने त्याचे नाव बदलून राजकुमार चौधरी ठेवले आहे आणि तो निकोल भागात राहत आहे.

पोलिसांनी सांगितले की अटक केल्यानंतर चौधरीने कबुली दिली की आपण आणि त्याच्या वडिलांनी मृत्यूचा बनाव करून विम्याचे पैसे मिळवण्याची योजना आखली होती. योजनेनुसार, अनिल सिंह चौधरी यांनी 2004 मध्ये अपघाती मृत्यू विमा पॉलिसी घेतली आणि नंतर कार खरेदी केली.

त्यानंतर अनिल सिंग चौधरी, त्याचे वडील आणि भाऊ यांनी ट्रेनमध्ये एका भिकाऱ्याला जेवणाचे आमिष दाखविले. या लोकांनी भिकाऱ्याला आग्राजवळील एका हॉटेलमध्ये नेले आणि त्याला नशामिश्रित अन्न दिले.

यानंतर आरोपींनी बेशुद्ध पडलेल्या भिकाऱ्याला कारमध्ये नेले आणि अपघात झाल्याचे भासवण्यासाठी मुद्दाम कार विजेच्या खांबावर आदळल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघातामुळे कारला आग लागल्याचे भासवण्यासाठी त्यांनी भिकाऱ्याला ड्रायव्हरच्या सीटवर बसवले आणि कारला आग लावल्याचे पोलिसांनी सांगितले.

अनिल सिंग चौधरीचे वडील विजयपाल सिंग यांनी हा मृतदेह त्यांच्या मुलाचा असल्याचे ओळखले आणि गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

पोलिसांनी सांगितले की, योजनेनुसार, विजयपाल सिंह चौधरी यांनी त्यांच्या मुलाचा अपघाती मृत्यू विमा म्हणून 80 लाख रुपयांचा दावा करून रक्कम मिळविली आणि ती रक्कम कुटुंबातील सदस्यांमध्ये वाटली गेली.

अहवालामध्ये म्हटले आहे की, त्याचा वाटा घेतल्यानंतर अनिल सिंह चौधरी २००६ मध्ये अहमदाबादला आले आणि त्यांनी कधीही उत्तर प्रदेशातील त्यांच्या मूळ गावाला भेट दिली नाही.