ताज्या बातम्याराजकारण

Ajit Pawar : …तर मी जीवन संपवणार होतो! २४ तासांत सोडला अजित पवार गट; यू टर्न घेताच नेत्याचे गंभीर आरोप

Ajit Pawar : महायुतीच्या सत्ता स्थापन झाल्यापासून अनेक विरोधक पक्षांतर करत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यातच २ दिवसांपूर्वी ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का बसला. त्यांचे निकटवर्तीय अभिजीत पवार आणि हेमंत वाणी यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र, अवघ्या ४८ तासांतच अभिजीत पवारांनी यूटर्न घेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुनरागमन केले.

“माझ्यावर प्रचंड दबाव होता, आत्महत्येचा विचार केला होता”

अभिजीत पवारांनी पक्षात पुनरागमन केल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन धक्कादायक खुलासे केले.
“अजित पवारांच्या गटात जाण्यासाठी माझ्यावर प्रचंड दबाव टाकण्यात आला होता. मला केवळ जितेंद्र आव्हाडांना अडचणीत आणण्यासाठी वापरण्यात येत होते. एवढाच नाही, तर माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून पुन्हा दोन वर्षांसाठी तुरुंगात पाठवण्याचे कारस्थान रचले गेले होते. मला ईडी आणि पोलिसांच्या धमक्या देण्यात येत होत्या. मी इतका अस्वस्थ झालो होतो की, जर जितेंद्र आव्हाड यांचा फोन आला नसता, तर २२ फेब्रुवारीला आत्महत्येचा निर्णय घेतला असता.”

“आव्हाड हेच माझे खरे नेते, मी त्यांची साथ सोडणार नाही”

अभिजीत पवार यांनी स्पष्टपणे सांगितले की, जितेंद्र आव्हाड हेच त्यांचे खरे नेते आहेत आणि ते कधीही त्यांची साथ सोडणार नाहीत.
“पक्ष सोडण्यापूर्वी मला आव्हाड सरांशी बोलायला हवं होतं, पण माझ्यावर प्रचंड दबाव असल्याने ते शक्य झालं नाही. मात्र, आता घेतलेल्या निर्णयामुळे तरी ठाण्यात सुरू असलेले ब्लॅकमेलिंगचे प्रकार थांबतील, अशी आशा आहे.”

पक्षांतराचा नवा ट्रेंड आणि राजकीय उलथापालथ

अभिजीत पवार आणि हेमंत वाणी यांच्या अजित पवार गटात प्रवेशाने ठाण्यात राजकीय चर्चा रंगली होती. मात्र, अवघ्या ४८ तासांतच अभिजीत पवार यांनी आपला निर्णय बदलला आणि पुन्हा शरद पवारांच्या गटात परतले. त्यामुळे ठाण्यातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे. या प्रकारामुळे महायुतीच्या इनकमिंग ट्रेंडला मर्यादा लागणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

Back to top button