Uddhav Thackeray : रायगड जिल्ह्यातील राजकारण सध्या तापलेलं असून, पालकमंत्री पदावरून राजकीय चुरस वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्यात आपली ताकद वाढवण्याची होड आहे, विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनिल तटकरे आणि त्यांच्या कन्या अदिती तटकरे यांच्यात वर्चस्वासाठी चुरस दिसत आहे.
दोन्ही पक्षांनी शक्तीप्रदर्शन आणि सत्ता स्थापनेसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. याच दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसला एक मोठं यश मिळालं असून, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना ठाकरे गटाला धक्का देत लवकरच एक महत्त्वाचा पक्षप्रवेश होणार आहे.
आज होणार अंतिम निर्णय
मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का देण्यासाठी तयारीत आहे. महाडमधील शिवसेना ठाकरे गटाच्या विधानसभेच्या उमेदवार, स्नेहल जगताप हे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे जाण्याच्या तयारीत आहेत. यासंदर्भात प्रारंभिक चर्चा झाल्यानंतर, आज सुतारवाडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी आणि जगताप कुटुंबीयांसोबत अंतिम चर्चा होणार आहे.
गोगावले यांना शह देण्यासाठी तटकरेंची खेळी?
सूत्रांच्या माहितीनुसार, स्नेहल जगताप या चर्चेला उपस्थित राहणार नसल्याचं सांगितलं आहे. रायगडमधील पालकमंत्री पदावरून सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात वाद सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर, भरत गोगावले यांना शह देण्यासाठी सुनील तटकरे यांनी ही चाल खेळली असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. काही काळापूर्वी, स्नेहल जगताप यांच्या भाजप प्रवेशाबाबत देखील प्रयत्न सुरू होते.
स्नेहल जगताप कोण आहेत?
स्नेहल जगताप हे काँग्रेसचे माजी दिवंगत आमदार माणिक जगताप यांच्या कन्या आहेत. महाड नगरपालिकेचे नगराध्यक्षा पद त्यांनी भूषवले होते. दोन वर्षांपूर्वी, स्नेहल यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता आणि 2024 मध्ये त्यांनी भरत गोगावले यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत, सुनील तटकरे यांनी स्नेहल यांना मदत केल्याचा आरोप भरत गोगावले यांनी केला होता.
पालकमंत्री पदावरून वाद
18 जानेवारी रोजी महायुती सरकारने पालकमंत्री पदाची यादी जाहीर केली, त्यानंतर शिवसेना शिंदे गटात मोठी धुसफूस झाली आहे. पालकमंत्री पदासाठी इच्छुक असलेल्या मंत्री भरत गोगावले आणि दादा भुसे यांना यादीतून वगळण्यात आलं, ज्यामुळे त्यांच्यात असंतोष वाढला. विशेषतः गोगावले यांना रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी आग्रही असताना त्यांना त्याची संधी न मिळाल्याने ते नाराज झाले. त्यानंतर आदिती तटकरे यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती केली गेली, मात्र नंतर या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली.