‘फूट हा दिखावा, पवारांनी भाजपचा कार्यक्रम केलाय’; ४० वर्ष सोबत काम केलेल्या सहकाऱ्याने सांगीतले कारण

अजित पवार हे बंड करत सत्तेत गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडले आहे. एक गट शरद पवारांचा आहे तर दुसरा गट हा अजित पवारांचा आहे. अजित पवारांनी भाजप-शिवसेनेशी हात मिळवला आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

अजित पवारांचे हे बंड राज्यभरात चर्चेचा विषय ठरले आहे. या बंडावर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. राजकीय नेते सुद्धा यावर प्रतिक्रिया देत आहे. काहींनी तर या बंडामागे शरद पवारांचाच हात आहे, असेही म्हटले आहे. तर काहींनी या बंडामुळे शरद पवार एकटे पडल्याची चर्चा आहे.

असे असतानाच शरद पवार यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे जुने सहाकारी आणि भाजप नेते चंद्रराव तावरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीतील ही फुट टाईमपास असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या विधानाने एकच खळबळ उडाली आहे.

पवार कुटूंबातील ही फुट फक्त एक टाइमपास आहे. तो लोकांना दाखवण्यासाठी केलेला दिखावा आहे. निवडणूकापर्यंत ज्या गोष्टी घडणार आहे, त्यासाठी ही फुट पडलेली आहे, असे चंद्रराव तावरे यांनी म्हटले आहे.

तसेच पुढील निवडणूकीत हे सर्व एकत्र येतील. त्यामुळे भाजपने अजित आपल्यात सहभागी झाले आहे, असा विचार करु नये आणि वेळेत ही चुक सुधरावी, असे म्हणत चंद्रराव तावरे यांनी भाजपला एक इशाराही दिला आहे.

मी ४० वर्ष शरद पवार आणि त्यांच्या कुटूंबासोबत होतो. त्यांचे प्रत्येकाचे स्वभाव मला माहिती आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की ही फुट आहे. ज्या चौकश्या लागल्यात त्यातून राष्ट्रवादीच्या नेत्यांना सोडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मोदींनी ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा उल्लेख केला होता. त्यानंतरच अजित पवारांचे हे बंड झाल्याचे तावरे यांनी म्हटले आहे

निवडणूकीवेळी प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील हे सर्व एकत्र येतील. आमदारांची जुळवाजुळव करणंं ही तर कला आहे आणि शरद पवारांची ही कला सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे मला वाटतंय निवडणूकीला ते परत येतील, असे चंद्रराव तावरे यांनी म्हटले आहे.