---Advertisement---

Milind Narvekar : ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकर सगळ्यांच्या समोर म्हणाले, शिंदे साहेब माझं ऐका, आपल्या दोघांना मिळून काहीतरी करावं लागेल!

---Advertisement---

Milind Narvekar : वाघांची शिकार आणि तस्करी करणाऱ्यांसाठी कठोर कायदा लागू करावा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव आणि विधानपरिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी केली आहे. आसामच्या धर्तीवर राज्यातही वाघांची शिकार करणाऱ्यांसाठी एक कठोर कायदा लागू करावा, अशी मागणी करत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून मिश्किल टिप्पणी केली. “शिंदे साहेब, तुम्ही सुद्धा हे ऐका, आपल्याला यामध्ये मिळून काहीतरी करावं लागेल,” असे ते म्हणाले.

नार्वेकर यांनी सभागृहात वाघांच्या तस्करी संदर्भात चर्चा करत, आसाममध्ये गेंड्यांच्या तस्करी करणाऱ्या टोळीविरोधात जो कायदा करण्यात आला, त्याचप्रमाणे वाघांच्या तस्करी आणि शिकार करणाऱ्यांसाठीही कठोर कायदा राज्यात लागू करावा, अशी विनंती केली. त्यांनी सांगितले की, राज्यात वाघांची तस्करी आणि शिकार करणाऱ्यांची टोळी सक्रिय आहे, आणि याबाबत कडक कारवाई आवश्यक आहे.

राज्यातील टिपेश्वर अभयारण्यात पीसी वाघिणीच्या तस्करीसाठी तिच्या गळ्यात तारेचा फास घातल्याची घटना ताजी असताना, पवणार येथील एक अन्य वाघिणीच्या गळ्यातही तारेचा फास सापडला आहे. यामुळे नार्वेकर यांनी अशी मागणी केली आहे की, राज्यातही अशा तस्करी विरोधी कठोर कायदा लागू करावा.

सद्यस्थितीत वाघांची शिकार करणारी बहेलिया टोळी सक्रिय आहे आणि म्यानमार मार्गे गेल्या चार महिन्यात भारतातून किमान 15 वाघांची तस्करी चीनमध्ये करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाघांच्या शिकारीच्या मोबदल्यात बहेलिया टोळीला पैसे पुरवणाऱ्या मिझोराम येथील जमखानकप या आरोपीच्या अटकेनंतर या तस्करीचे खुलासे झाले. मध्य भारतात पुन्हा एकदा वाघ शिकाऱ्यांच्या रडारवर आले आहेत आणि मोठ्या प्रमाणात वाघांच्या कत्तलीच्या घटना उघड झाल्या आहेत.

वाघांची तस्करी रोखण्यासाठी सरकार काय उपाययोजना घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. वनमंत्री गणेश नाईक यांनी यावर उत्तर दिले की, या प्रकारच्या कायद्याचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---